नवी दिल्ली – सन 2025 पर्यंत भारताला इलेक्ट्रिक वाहनांच्या संबंधात ग्लोबल हब होण्याची संधी आणि पूर्ण क्षमता आहे. त्यासाठी वाहन उत्पादकांनीही यात मोठी भूमिका बजावली पाहिजे. या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी नफ्यावर लक्ष केंद्रीत न करता मार्केटवर वर्चस्व मिळवण्याचे काम करावे आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमीच ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
एकदा हे इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट विस्तारले की वाहन उद्योगांना मागे पाहण्याची गरज नाही. इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार वाढला तर तेलाच्या आयातीचे प्रमाण कमी होईल आणि प्रदूषणावरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण येईल, असे ते म्हणाले. यासाठी वाहन उद्योगाला सरकारतर्फे आवश्यक ते सर्व सहकार्य करता येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
फिक्कीतर्फे आयोंजित करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोबिलिटी कॉन्फरन्स मध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या संबंधात भारताच्या सरन्यायाधीशांपुढे आपण एक तासांचे प्रेझेन्टेशन सादर करणार आहोत. दिवाळीनंतर हा कार्यक्रम केला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. इलेक्ट्रिक वाहने हे भारताचे भविष्य आहे.
भारत पुढील पाच वर्षात जगातील सर्वात जास्त इलेक्ट्रिक वाहने उत्पादन करणारा देश ठरू शकतो असेही ते म्हणाले. या स्पर्धेत वाहन उद्योगाने केवळ बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. या क्षेत्रातील वाहन उद्योगासाठी कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. विजेचे दरही कमी होत आहेत. त्यामुळे या क्षेत्रासाठी लाभाचीच स्थिती उपलब्ध आहे असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले.