– विनोद मोहिते
इस्लामपूर – लोकांच्या हिताच्या प्रश्नासाठी इस्लामपूरच्या नागरिकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करण्याचा एकसूत्री कार्यक्रम गेल्या चार वर्षात सुरू ठेवला. आतां राहिलेल्या वर्षभरात तरी लोकहिताचा निर्णय घ्या असा सल्ला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना दिला.
ते म्हणाले,” नगराध्यक्षांनी शहराच्या विकासासाठी ११४ कोटींचा निधी आणला, मग तो गेला कुठे? या निधीतून कोण-कोणती विकास कामे झाली? ते जाहीर करा. खोटे बोलून शहरवासियांची दिशाभूल करू नका. उठसुठ राज्याचेजल संपदामंत्री जयंतराव पाटील यांच्यावर टीका-टिप्पणी करण्याचा उद्योग बंद करा, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
या पत्रकार बैठकीला उपनगराध्यक्ष दादासो पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक शहाजीबापू पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, नगरसेवक आनंदराव मलगुंडे, नगरसेवक विश्वनाथ डांगे, नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, कमल पाटील, हिंदुराव माळी उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले,”राज्याचा एखादा नेता इस्लामपूरला येणार असेल,तर त्याच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषद घ्यायची, आणि मंत्री पाटील यांच्यावर टीका करायची, हा एक कलमी कार्यक्रम नगराध्यक्षांनी राबविला आहे. त्यांचे शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष आहे.
गेल्या ४ वर्षात विशेष अनुदान १० कोटी, आणि मंडईसाठी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून २ कोटी असे एकूण १२ कोटीशिवाय आपण तुमच्या सरकार कडून किती निधी आणला? या व्यतिरिक्त जो निधी आला,तो राज्यातील सर्व नगर पालिकांना मिळतो,तसा नियमित निधी आहे. त्यात तुमचे योगदान काय आहे?
शहाजी पाटील म्हणाले, आपण नगरपालिकेच्या कामास किती वेळ देता? हे शहरातील जनता बघत आहे. मंत्री पाटील यांनी आपल्यावर टीका केली नव्हती. मग त्यांचे बोलणे तुम्हाला एवढे का झोंबले? पुढील एक वर्षांत शहराच्या विकासावर लक्ष द्या. राष्ट्रवादी काँग्रेस विकास कामास निश्चितपणे सहकार्य करेल.
जयंतराव पाटील यांनी पूर्वी आमची सत्ता असताना कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शहराच्या विकासाला आकार दिला आहे. त्यांनी गेल्या ५ वर्षात आमदार फंडातून साडेपाच कोटी,तर ३० जूनला शहराच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी दिला आहे. तो सार्वजनिक बांधकाम,व पंचायत समितीकडे वर्ग केला आहे. हा निधी सार्वजनिक बांधकामकडेच वर्ग करा, असा आग्रह नगरसेवक विक्रम पाटील यांनीही केला आहे. तो का केला आहे? याचे आत्मचिंतन करा. मंडईच्या कामास आमचा विरोध नाही. मात्र ज्या पध्दतीने काम करणार आहात,ते आम्हास मान्य नाही. आम्ही त्या विरोधात मा. जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार करणार आहोत.
नगरसेवक डॉ.संग्राम पाटील म्हणाले,” जयंत पाटील यांनी रस्त्यासाठी २३ कोटी रुपये दिले होते. त्याचे व्याज ५ कोटी २८ लाख झाले. या निधीतून भुयारी गटारी योजनेचे काम झाले आहे. या कामास १४ व्या वित्त आयोगाकडून १६ कोटी घेतले. १० कोटी ९० लाखाचे काम झाले. मग तुम्ही आणलेले ८० कोटी गेले कुठे? तत्कालीन फडणवीस सरकारने भुयारी गटारी योजनेस एक रुपयाचाही निधी न देता शहरवाशीयांच्यावर चतुर्थ वार्षिक वर्गणी, व उपभोगता कराचा भुर्दंड बसविला आहे. आम्ही त्यास विरोध केला होता.”
माजी नगराध्यक्ष भगवान पाटील म्हणाले, गेल्या तीस वर्षात शहराच्या विकासासाठी काय केले? असे नगराध्यक्षांनी म्हणणे हास्यास्पद आहे. पूर्वी २ हजार २०० घरे असणाऱ्या शहरात आज २२ हजार घरे आहेत. शहराचा काहीच विकास केला नाही, मग शहर वाढले कसे? आम्ही नगरपलिकेमध्ये काम करताना स्व.अशोकदादा,डांगे गटाशी आमचे मतभेद व्हायचे,मात्र आम्ही कधी सुडाचे राजकारण केले नाही. शहराच्या विकास कामात आम्ही सर्वजण एकत्र होतो.
नगरसेवक आनंदराव मलगुंडे म्हणाले,विना परवाना घरे बांधलेल्या नागरिकांना घरपट्टी एवढा दंड आकारण्याचा निर्णय परस्पर घेतला आहे. त्यास कौन्सिलची मान्यता का घेतली नाही? गेल्या ६ महिन्यात एकही बांधकाम परवाना दिलेला नाही. मुख्याधिकाऱ्यांना आपण विचारले का?
विधानसभेचा राग?
गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील जनतेने नगराध्यक्षांना स्विकारलेच नाही. मतदारांनी जयंत पाटील यांना भरभरून मतदान केले. याचा राग मनात धरून नगराध्यक्ष शहरातील नागरिकांशी वागत आहेत काय? असा सवालही शहाजी पाटील यांनी उपस्थित केला.
शहरातील साथीच्या आजारांवर मात करताना सर्वांनी मिळून जनतेच्या हिताचा निर्णय घेऊया. तुम्हाला आमचा नेहमीच सकारात्मक पाठिंबा असेल. गेल्या चार वर्षात प्रसिद्धीचा आपण स्टंट करत आहात आता विकासकामांवर लक्ष केंद्रित करा असा सल्लाही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.