नवी दिल्ली – ज्या कंपन्यांमध्ये पारदर्शक, कार्यक्षम, सुशासन म्हणजे कार्पोरेट गव्हर्नंस आहे, अशा कंपन्यांकडे केवळ मोठेच नाही तर किरकोळ गुंतवणूकदार आकर्षित होतात असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
कंपनी सचिव संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सीतारामन म्हणाल्या की, कंपनी सचिवाचे कंपनीच्या कामकाजाकडे बारीक लक्ष असते. कंपनी सचिवाच्या सूचनांकडे लक्ष देऊन कंपनीच्या व्यवस्थापनात बदल केल्यास त्याचा सर्वांनाच लाभ होत असतो. भारतातील कंपन्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालविल्या जात आहेत. त्यामुळेच गेल्या काही वर्षापासून भारतीय कंपन्यांवरील परदेशी आणि देशातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे.
ज्या कंपन्या नियमानुसार पारदर्शकपणे चालतात त्यांच्या कामकाजाविषयी गुंतवणूकदारांना आवश्यक ती माहिती मिळते. त्यामुळे गुंतवणूकदार अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. भारतामध्ये शेअर बाजारात मोठ्या गुंतवणूकदारांबरोबरच किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वेगाने वाढत आहे. आगामी काळामध्ये कंपन्यांची नोंदणी वाढणार आहे. मात्र ज्या कंपन्या व्यवस्थित चालतील त्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक कायम ठेवतील, ही गोष्ट विसरता कामा नये असे त्यांनी सांगितले.
या प्रक्रियेत कंपनी सचिवाची भूमिका महत्त्वाची ठरत असते, असे त्या म्हणाल्या. भारतात उद्योग करणे सोपे व्हावे याकरिता जुने अनावश्यक कायदे रद्द करण्यात येत आहेत. त्याचबरोबर नवे साधे, सुटसुटीत कायदे तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे भारतात उद्योग करणे दिवसेंदिवस अतिशय सोपे होत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगांना परवानगीसाठी शक्य तितक्या लवकर राष्ट्रीय पातळीवर एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.
भारतातील कंपन्यांना देशांतर्गत गुंतवणूक मिळण्याबरोबरच परदेशातील गुंतवणूक मिळत आहे. कारण या कंपन्या व्यवस्थित चालतात आणि त्या चालविल्या जात असल्याचे पारदर्शकपणे त्यांच्या ताळेबंदातून दिसून येते. अशाप्रकारे कंपनी चालविण्याची संस्कृती आगामी काळातही कायम ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कायद्याबाबत कंपन्यांच्या काही अडचणी असल्या तर त्या सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या ताबडतोब सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. करोनाच्या काळामध्ये भारतीय कंपन्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे करोना संपुष्टात येत असताना या कंपन्या वेगात पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.