NEET Paper Leak: नीट पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संसदीय समितीच्या बैठकीत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अधिकाऱ्यांची जोरदार कोंडी झाली. “पेपर फुटला नाही” असा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांना खासदारांनी थेट सवाल करत धारेवर धरले. “पेपर फुटला नाही तर मग प्रश्नपत्रिका बाहेर आली कशी?” असा आक्रमक सवाल अनेक सदस्यांनी उपस्थित केला. “आमच्या सिस्टिममधून पेपर फुटलेला नाही” बैठकीला NTAचे अध्यक्ष प्रदीपकुमार जोशी आणि महासंचालक अभिषेक सिंह उपस्थित होते. त्यांनी राधाकृष्णन समितीच्या शिफारसींवर सादरीकरण करत परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याचा दावा केला. मात्र, पेपरफुटीबाबत ठोस उत्तर देण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. “आमच्या सिस्टिममधून पेपर फुटलेला नाही,” अशी भूमिका NTAकडून मांडण्यात आली. त्यावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीव्र आक्षेप घेत तपासाचा संपूर्ण अहवाल समितीसमोर मांडण्याची मागणी केली. दरम्यान, बिहार, गुजरात आणि राजस्थानमध्ये NEET पेपरफुटी प्रकरणात अनेक अटकसत्रे झाल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. बिहारमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने सीबीआयकडे तपास सोपवल्यानंतर देशभरात आंदोलनं पेटली होती. बैठकीदरम्यान भाजप खासदारांनी सीबीआय तपासावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. “सीबीआय ही स्वतंत्र यंत्रणा असून तिला निष्पक्ष तपास करू द्यावा,” अशी भूमिका भाजप सदस्यांनी घेतली. मात्र, विरोधी पक्षांनी NTAच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणांची मागणी केली. NEET परीक्षा रद्द करून ती २१ जूनला पुन्हा घेण्याचा निर्णय झाल्यानंतर लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे. देशभरातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आंदोलन छेडत NTA बरखास्त करण्याची मागणीही केली आहे.