मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने एकनाथ खडसे यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने माझ्यावर अन्याय केला परंतु शरद पवारांनी विश्वास दाखवत मला संधी दिली. एकनाथ खडसे राजकारणातून इतिहास जमा झालेत असे म्हणणाऱ्यांना आता उत्तर मिळाले आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली आहे.
2014 साली भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सरकारमध्ये असतानाच झालेल्या आरोपामुळे एकनाथ खडसे यांना महसूल आणि कृषी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या प्रकरणानंतर ईडीचा फेरा त्याच्यामागे लागला.
पुढे 2019 साली खडसे यांना विधानसभेचे तिकीट देखील नाकारण्यात आले. दुसरीकडे ईडीच्या नोटीसा येणे सुरुच होते. त्यामुळेच खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार यासाठी संधी देण्यात आली, मात्र जवळपास दीड वर्ष उलटून देखील अद्याप त्याबाबत निर्णय झाला नाही. परंतु दरम्यानच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खडसे यांनी 21 पैकी 11 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आणून बँक आपल्या ताब्यात घेतली आणि खान्देशात पक्षाची ताकद वाढवली होती.
दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आणि विधानभवनात भाजप विरोधातील एक महत्त्वाचा आवाज म्हणून एकनाथ खडसे यांना संधी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच विधानभवनात एकनाथ खडसे यांची विरोधकांवर तोफ धडाडताना पाहिला मिळेल. एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मुक्ताईनगर आणि जळगावात मोठा जल्लोष पहायला मिळत आहे.