नवी दिल्ली – पंजाब मध्ये नुकत्याच झालेल्या नगरपालिका व महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपला दारूण पराभव पत्करावा लागला असून कॉंग्रेसने तेथे एकतर्फी विजय मिळवला आहे. भाजपच्या या पराभवाचे विश्लेषण करताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी आंदोलनाशी भाजपच्या पराभवाचा संबंध जोडण्यास नकार दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे की आम्ही पंजाबात कमुवतच होतो. त्यातच आम्ही अकालदलाशी फारकत घेऊन स्वतंत्र लढलो त्यामुळे आम्हाला तेथे अपेक्षित यश मिळू शकले नाही इतकेच. या पराभवाचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी काही एक संबंध नाही असेही तोमर यांनी म्हटले आहे.
पंजाब मध्ये 109 नगरपालिका आणि आठ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे यातील बहुतांशी निवडणूका कॉंग्रेसने जिंकल्या असून भाजप तेथे चौथ्या आणि पाचव्या क्रमाकांवर गेली आहे. काही ठिकाणी तर भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही.
त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे. तोमर यांनी म्हटले आहे की पंजाबात आम्हाला पराभव पत्करावा लागला असला तरी आसामात भाजपला मोठे यश मिळेल असे भाकितही त्यांनी केले आहे.