मुंबई – जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून राणे यांचे पुतळे जाळले जात आहेत. अखेर याप्रकरणी राणे यांना पोलिसांनी अटकही केले आहे. अशातच मुख्यमंत्र्यावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राणे यांना केंद्रीय मंत्रिपदावरून हटवण्यात यावे अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मागणी पत्राला पंतप्रधान मोदी यांनी दहा मिनिटांतच उत्तर दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला असून, तुम्ही याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना द्या, त्यांच्याशी बोला आणि त्यांची भेट घ्या, असे उत्तर आल्याचेही राऊत यांनी सांगितले आहे.
राऊत यांनी पत्रात काय म्हटले होते?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. ती अतिशय दुर्दैवी असून अशी भाषा सहन केली जाऊ नये. शिष्टाचार राखला गेला पाहिजे, असे विनायक राऊत यांनी पत्रात म्हंटले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे. राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक राणेंच्या घरी पोहोचले आणि त्यांना अटक केली.