पुणे – उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील विद्यार्थी अक्षय शहाजी देवकर याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला ९४% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता, म्हणून अक्षय तणावात होता आणि याच शैक्षणिक काळजीमुळेच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
याप्रकरणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा,’ असे म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. संभाजीराजे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही पोस्ट केली आहे.
आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019
पुढे त्यांनी याप्रकरणी राजकीय नेते व प्रशासन यांच्यावर टीका करत शेतकरी आत्महत्या, आरक्षण या मुद्दयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2373999086208966/
त्यांनी म्हटले आहे की, ‘समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे’. सरकार मधले नेते असोत किंवा विरोधी पक्षातले. ‘योग’ करत आपण दोन मिनिट शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत?? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय?? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु वास्तवात आपलं आचरण त्याप्रकारचं आहे कां? की उगाच मुह में राम, बगल में सूरी असा प्रकार चालू आहे? नाहीतरी आज एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर खरी सुरुवात होती.
गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील ते युवक आणि ज्यांच्या मुळे आपलं आज जीवंत असणं सुरक्षित आहे ते शेतकरी, ह्या सर्वांना असुरक्षित कां वाटतंय ? कां म्हणून ते स्वतःला संपवत आहेत.
मला वाटतंय की आपल्या ‘व्यवस्थेतच’ मोठा दोष आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही? असे अनेक प्रश्न राज्यासमोर आवासून उभे आहेत
यामध्ये नेत्यांसोबत प्रशासनसुद्धा तेवढंच जबाबदार आहे.केवळ नेत्यांवर प्रत्येक गोष्ट शेकते म्हणून तुमच्यावर कुणाचं लक्षंच नाही असं समजू नका. ‘शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये’ असं शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते,ते आजही तंतोतंत खरे आहे.