मुंबई- “आपण म्हणतो मराठेशाहीने काय केले, तर त्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. मराठा साम्राज्याने पाकिस्तानातील अटोक किल्ल्यावर झेंडे फडकवले. आपण या लोकांचे वारसदार आहोत हे विसरू नका आणि कधी कोणासमोर “मिंधे’ होऊ नका, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युवकांना दिला.
ते येथील व्हिजेटीआय महाविद्यालयात आयोजितस कार्यक्रमात बोलत होते. वास्तविक उद्धव ठाकरे सातत्याने शिंदे गटातील आमदारांना मिंधे म्हणून संबोधतात. त्यामुळे राज ठाकरेंचा टोला शिंदे गटाला तर नव्हता ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
राज ठाकरे सडेतोड बोलण्यासाठी सर्वांना परिचित आहेत. ते आपल्या भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. राज ठाकरे बोलताना पुढे म्हणाले, आपण शिवरायांचे वारसदार आहोत, हे कधी विसरू नका. मराठी पताका ही कायम स्वरूपी डोक्यात ठेवा. तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे कायम लक्षात ठेवा.
मित्र-मैत्रीण करताना कधीही कोणाची जात पाहू नका, या जातीपाती मधून काहीही हाताला लागणार नाही, आपण मराठी आणि हिंदू आहोत येवढे फक्त लक्षात ठेवा,’ असा मोलाचा सल्लाही राज ठाकरे यांनी कॉलेजवयीन मुला-मुलींना दिला आहे.