पंढरपूर – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत मिळून राज्यात सरकार स्थापन केले. मात्र सरकारचा पूर्णपणे मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झाला नाही. यावरूनच शिंदे यांच्या गटातील अनेक नेते वेळोवेळी आपली खदखद बोलून दाखवत असल्याचे सातत्याने समोर येते.
अशातच आमदार बच्चू कडू यांचे नाव चर्चेत असते. त्यांनी अनेकदा मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत सरकारला मागणी केली आहे. मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यांच्या मागणीचा शिंदे-फडणवीस सरकारकडून कोणताही विचार केला जात नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आज पंढरपूरमध्ये बोलताना कडू यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केले आहे.
बच्चू कडू म्हणाले, विधानपरिषदेच्या निकालाचा विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होत नसतो, मात्र मंत्रिमंडळ विस्तार न केल्यास त्याचा फटका शिंदे-फडणवीस सरकारला बसू शकतो. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने लोकांची कामे खोळंबू लागली आहेत. त्यामुळे जनतेत नाराजी आहे. याचा फटका सरकारला बसू शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात एका मंत्र्याकडे सध्या अनेक खाती आहेत. अनेक जिल्ह्यांना एकच पालकमंत्री आहे त्यामुळे लोकांची कामे होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष उत्पन्न होत असून सरकारला या रोषाला समोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
ठाकरे-आंबेडकर युतीबाबत बोलताना कडू म्हणाले की, ही युताचा केवळ सत्ता मिळविणे हा उद्देश आहे. भगवा आणि निळा केवळ खुर्चीसाठी जवळ आल्याचा टोलाही त्यांनी लगावला. नेते एक झाले तरी मतदार किती एक होणार हा प्रश्न असल्याचे कडू म्हणाले.