मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी करून भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केली. शिवसेनेतून एकनाथ शिंदेंसोबत आलेले आमदार खातेवाटपानंतर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आमदारांनी माध्यमांसमोर येऊन नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र आता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणातील वक्तव्याने खातेवाटपावरून त्यांची खदखद बाहेर आली आहे.
चांगल्या खात्यासाठी थोडासा आग्रह पकडला असता तर याच्यापेक्षाही चांगलं खातं मला मिळालं असतं असं वक्तव्य, गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. पण जे चाललंय ते चालू द्या असं म्हणत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे चांगल्या खात्याची अपेक्षा केल्याचे बोलले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील फुलगाव येथे पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
दरम्यान, धुळ्यातील सभेत बोलताना पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला धक्का बसलाय. यानंतर आता उद्धव ठाकरेंचे जवळचे मानले जाणारे मिलींद नार्वेकरही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य पाटील यांनी केले होते.