Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतलेल्या मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांची भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज शुक्रवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भेट घेत संवाद साधला. यावेळी आंदोलनाऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन लाड यांनी केले. अंतरवाली सराटी गावात झालेल्या भेटीत लाड यांनी, पूर्वी आपल्यात वैचारिक मतभेद होते आणि दोघांनीही एकमेकांवर टीका केली होती, याची कबुली दिली. मात्र, गेल्या ७० वर्षांत मराठा समाजासाठी सर्वाधिक काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा दावा त्यांनी केला. मराठा समाजासाठी केलेले काम समजून घ्यावे – “माझे आणि जरांगे यांचे काही गैरसमज झाले असतील. मात्र, फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केलेले काम समजून घ्यावे, अशी मी वारंवार विनंती केली होती. अलीकडील पत्रकार परिषदेत जरांगे यांनीही फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील समाजासाठी काम केले आहे,” असे लाड म्हणाले. ३० मेपासून पुन्हा आंदोलन छेडण्याच्या जरांगे यांच्या घोषणेवर बोलताना लाड म्हणाले, “तीव्र उन्हाळा, पेरणीचा हंगाम आणि शाळांच्या सुट्ट्या यामुळे आंदोलनासाठी हा योग्य काळ नाही. सरकारने अनेक पावले उचलली असून त्यासंदर्भातील माहिती मी आणली आहे.” हेही वाचा – मोठी बातमी! राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ‘या’ 4 नावांची चर्चा मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून आलो – “मी येथे आमदार किंवा भाजप नेते म्हणून नव्हे, तर मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून आलो आहे. समाजामुळेच मी लोकप्रतिनिधी झालो. जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला देशभरात सन्मान मिळाला आहे. माझ्याबद्दल त्यांच्या मनात असलेली कटुता दूर व्हावी, अशी माझी इच्छा आहे,” असेही लाड यांनी सांगितले. आंदोलनातील काही मागण्या पूर्ण झाल्या असून काही अद्याप प्रलंबित आहेत. सरकार आणि आंदोलक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आपण मध्यस्थाची भूमिका निभावू शकतो का, असा प्रश्नही त्यांनी जरांगे यांच्यासमोर उपस्थित केला. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले, “प्रसाद लाड हे प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेतून भेटायला आले होते. त्यामुळे मी त्यांचे स्वागत केले. आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी त्यांना दिली आहे.” जरांगे यांनी गेल्या आठवड्यात ३० मेपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप २९ मेपर्यंत करावे, अशी मुदत त्यांनी राज्य सरकारला दिली आहे. सर्व मराठ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील कुणबी म्हणून मान्यता द्यावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तसे आढळल्यास उद्या सकाळीच फाशी घेतो – भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी विद्यार्थ्यांची अडकलेली शिष्यवृत्ती आणि आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज या मुद्द्यांवरून महायुती सरकारला लक्ष्य केले. आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रांना काही वाईट बोललो का? मग अंतरवाली सराटीत लाठीमार का करण्यात आला होता? आम्ही पैशाने किंवा पदाने फुटत नाही… मी कोणाकडून एक रुपयाही घेतल्याचे दाखवून द्या… तसे आढळल्यास उद्या सकाळीच फाशी घेतो, असे खुले आव्हान जरांगे यांनी लाड यांना दिले. त्यावर मी फक्त मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. कृपया आपण आंदोलन मागे घ्यावे, मराठ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मी स्वत:हून आमदारकीचा राजीनामा देईन, अशी विनंती लाड यांनी केली. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून आहे.