नवी दिल्ली – जे स्वताच देशद्रोही आहेत त्यांनी दुसऱ्यांना देशभक्तीचे पाठ शिकवू नयेत असा पलटवार कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नढ्ढा यांच्यावर केला आहे. आज नढ्ढा यांनी राहुल गांधींवर टीका केल्यानंतर त्याला प्रत्युत्त्तर देताना खर्गे बोलत होते.
खर्गे म्हणाले की आज देशापुढे अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत त्या प्रश्नांकडे कोणाचे लक्ष जाऊ नये म्हणून असे भंपक आरोप भाजपकडून केले जात आहेत. आपल्या जवळच्या मित्राकडून झालेला घोटाळा दाबण्यासाठीचाही हा प्रकार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. नढ्ढा यांनी राहुल गांधी यांनी देशद्रोही भूमिका घेतल्याचे विधान केले होते. त्या संबंधात खर्गे यांनी ही टीका केली.
खर्गे म्हणाले की अगदी स्वातंत्र्यपुर्व काळापासूनच त्यांनी देशद्रोही भूमिका घेतली होती. ते कधीही स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले नाहींत आणि ज्यांनी ब्रिटीशांना सहकार्य करून देशद्रोह केला त्यांनी देशभक्ती शिकवण्याच्या भानगडीत पडू नये असे ते म्हणाले. मोदींनी स्वता सहा ते सात देशात जाऊन भारत विरोधी विधाने केली आहेत.
आम्ही मागच्या जन्मी काय पाप केले होते की आम्ही हिंदुस्थानात जन्म घेतला असेही मोदी विदेशी भूमीत जाऊन म्हणाले आहेत. अशी लोकं आम्हाला देशद्रोही कसे म्हणू शकतात? असा सवाल खर्गे यांनी केला आहे. भारतीय नागरीकांचा व देशाचा अवमान केल्याबद्दल मोदींनीच माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्याची संधी मिळाली तर तेही भाजपला चोख प्रत्त्युतर देतील असेही त्यांनी निक्षुन सांगितले. आणि म्हणूनच भाजपचे लोक घाबरले आहेत असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. संसदेत सत्ताधारी पक्षच गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याचा अजब प्रकार सध्या दोन्ही सभागृहात दिसतो आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली.