शताब्दी रुग्णालयात जखमींची विचारपूस
मुंबई : मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. जखमींना मदत दिली जाईल. या दुर्घटनेतील कुटुंबियांचे पुनर्वसन केले जाईल. या दुर्घटनेच्या सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या दुर्घटनेतील जखमींची मालाडच्या शताब्दी रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारपूस केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर उपस्थित होते.
मुंबईत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आपत्कालिन यंत्रणा पूर्ण सक्रीय झाली असून, शासन यंत्रणा आणि मुंबई महापालिका समन्वयाने काम करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेकडूनही मदत देण्याबाबत निर्देश देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत एकाच दिवसात सुमारे साडेचारशे मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. अजूनही पाऊस सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील परिस्थितीवर सतर्कतेने नजर ठेवली जात आहे. आवश्यक तिथे मदत आणि आपत्कालिन यंत्रणा पोहचेल, असे प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई – मालाड पूर्व परिसरात भिंत कोसळली
दरम्यान, मुंबईतल्या मालाडमध्ये असलेल्या कुरार या ठिकाणी भिंत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी (2 जुलै) रात्री 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अती पावसामुळे ही भिंत खचली आणि त्याखाली दबून 13 जणांचा मृत्यू झाला.