मुंबई – देशासह राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेमध्ये सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्याच विधानावरून उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर सभेत राहुल गांधी यांना सुनावले आहे. त्यानंतर सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. तसेच राज्यातील सत्ताधारी पक्षानेही हा मुद्दा उचलून धरला आहे.
मालेगाव येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचा इशारा राहुल गांधी यांना दिला होता. या इशाऱ्यावरुन आता भाजप व शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हिम्मत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा, असे थेट आवाहन उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे नौंटकी करत आहेत. त्यांना खरचं सावरकरांबाबत प्रेम असेल. आदर असेल तर त्यांनी कॉंग्रेसची साथ सोडावी. कॉंग्रेस आणि राहुल गांधी रोज सावरकरांचा अपमान करत आहेत. त्यावेळी बाळासाहेबांनी ठाकरी बाणा दाखवला होता. आता तुम्हीही दाखवा ठाकरी बाणा. तुम्ही खुर्चीसाठी कॉंग्रेससोबत मांडली मांडी लावून बसला आहात. हिम्मत असेल तर सोडा कॉंग्रेसला, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात “सावरकर गौरव यात्रा’
स्वा. सावरकर यांचा वारंवार अपमान राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. स्वा. सावरकर यांचे त्याग, त्यांचे देशाप्रती असलेले समर्पणाच्या निमित्त राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
विरोधकांचे षडयंत्र – नाना पटोले
राहुल गांधी आपले विचार मांडत आहेत. उद्धव ठाकरे आपले विचार मांडत आहेत, ते दोघेही आपले विचार घेऊन पुढे जात आहेत. सावरकर मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत आहेत. परंतु त्यात त्यांना यश येणार नाही, आम्ही एकत्रच आहोत, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
आधी सावरकरांना भारतरत्न द्या – दानवे
भाजपने लिहून दिलेली स्क्रीप्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाचत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी इशारा केल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी कागद वाचला. सावरकरांची यात्रा काढणार असेल स्वागत आहे. पण, सावरकांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सातत्याने महाराष्ट्रात करण्यात येत आहे. 8 वर्षे केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे सर्वात आधी सावरकरांना भारतरत्न द्या. मग विचारधारा यात्रा काढावी, असे आव्हान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारला दिले.