नलगोंडा (तेलंगणा) – तेलंगणातील एका गावात सन 2014 साली महात्मा गांधी यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह देशात सध्या जसजसा वाढू लागला आहे तशी या मंदिरात दर्शनाला येणाऱ्यांची गर्दीही वाढू लागल्याचे मंदिराच्या व्यवस्थापकांना म्हटले आहे. या मंदिरात रोज साधारण 60 ते 70 जण दर्शनाला येत असत; पण आता ही रोजची भाविकांची संख्या साडे तीनशे ते चारर्शपर्यंत पोहचली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
हैदराबादपासून सुमारे 75 किमी अंतरावर असलेल्या तेलंगणातील चिताल जवळील पेड्डा कपार्थी गावात हे मंदिर आहे. महात्मा गांधीचे अशा प्रकारचे मंदिर ही एक दुर्मिळ बाब आहे. हे मंदिर आता लोकांचे मोठेच आकर्षण बनले आहे असे मंदिराची देखभाल करणाऱ्या महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव पीव्ही कृष्णा राव यांनी सांगितले. राव म्हणतात की, या मंदिरात सामान्यतः 60-70 पर्यटकांची संख्या असते पण तेलंगणा सरकार आणि केंद्राच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्याच्या पुढाकारानंतर येथे आता रोज 350 च्या आसपास भाविकांचा ओघ वाढलेला दिसत आहे.
ते म्हणाले की 2014 मध्ये हे मंदिर बांधले गेले. त्यात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोणतेही विशेष कार्यक्रम होत नाहीत, पण 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला येथे विशेष पूजा आयोजित केली जाते. हैदराबाद-विजयवाडा महामार्गाजवळ चार एकर जमिनीवर बांधलेल्या या मंदिरात महात्मा गांधींची मूर्ती ही लोकांना आशीर्वाद देत असल्याच्या स्थितीतील आहे. मंदिर ट्रस्टने जवळपासच्या गावांमध्ये जोडप्यांना त्यांच्या लग्नाच्या दिवशी रेशमी वस्त्रे देण्यास सुरुवात केली.
गावकरी लग्नाच्या आमंत्रण पत्रिका वाटण्याआधी येथे येऊन प्रार्थना करतात आणि बापूंचे आशीर्वाद घेतात, ही एक नवीन परंपरा येथे बनली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मंदिरात काही विशेष कार्यक्रम होणार आहेत काय, असे विचारता कृष्णा राव म्हणाले की, आम्ही महात्मा गांधी यांना केवळ स्वातंत्र्य लढ्याचे नेते एवढ्यापुरतेच मानत नाही. आम्ही त्यांना येथे एक महान अवतारी पुरुष मानतो.