मुंबई – राज्यातील करोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे ठाकरे सरकार महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास गेल्यावर्षीसारखी वाईट परिस्थिती ओढावू शकते. या भीतीने राज्यात वास्तव्याला असणाऱ्या परप्रांतीयांनी पुन्हा गावी परतण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
देशभरातून अनेक मजूर रोजीरोटीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये वास्तव्य करुन आहेत. यापैकी बहुतांश जण असंघटित क्षेत्र किंवा रोजंदारीवर काम करणारे आहेत. लॉकडाऊन झाल्यास सगळे दैनंदिन व्यवहार ठप्प होतील. त्यामुळे या कामगारांची उपासमार होऊ शकते. परिणामी हे सर्व मजूर आणि कामगार सध्या प्रसारमाध्यमांमधील प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून आहेत.
ठाकरे सरकारने अद्याप लॉकडाऊनचा ठोस निर्णय घेतलेला नाही. मात्र, आम्हाला गेल्यावेळीप्रमाणे पुन्हा स्वत:ची फरफट होऊन द्यायची नाही, असे परराज्यातील कामगारांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती.
परिणामी हातावर पोट असलेल्या मजुरांनी हजारो मैल दूर असणाऱ्या आपल्या गावी पायी चालत जाण्याचा मार्ग पत्करला होता. यामध्ये अनेक मजुरांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनचे ढग दाटू लागल्याने हे कामगार सावध झाले आहेत.
लॉकडाऊन करायचा झाल्यास सरकारने आम्हाला किमान दोन-तीन दिवस अगोदर सूचना द्यावी. जेणेकरून आम्ही येथे अडकून पडण्यापेक्षा आमच्या गावी जाऊ, असे अनेक कामगारांचे म्हणणे आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात दिवसाला 30 हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास लॉकडाऊन अटळ असेल. त्यामुळे अनेक लहान कंपन्यांमधील कामगारांनी गावी परतायला सुरुवात केली आहे.