कोल्हापूर – केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला प्रतिकार करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने 16 नोव्हेंबर रोजी ‘लेटर टू पीएम’ या राज्यव्यापी मोहिमेची हाक दिली आहे. कोल्हापुरात सोमवारी बिंदू चौकात बलीपूजन करून हे आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांची देशव्यापी संपूर्ण कर्जमुक्ती करा. शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावे. शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी. आयातीवर बंदी घाला. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रु. नुकसान भरपाई द्यावी.
पीकविमा योजनेतील त्रुटी दुरूस्त करून शेतकऱ्यांना विम्याचे सर्वंकष संरक्षण द्या, आदी मागण्या करणारी हजारो पत्रे शेतकरी पंतप्रधानांना लिहिणार आहेत. सोमवार (दि. 16 नोव्हेंबर) रोजी जिल्ह्यातील शेतकरी सकाळी 11 वाजता बिंदू चौकात बलिपूजन करून हजारो पत्रे पंतप्रधानांना पाठवणार आहेत. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.