भोपाळ – मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधिमंडळाच्या कोणत्या तरी एका सभागृहाचे सदस्य होण्याचे कायदेशीर बंधन आहे. तथापि, या अवधीत कोणत्याच सभागृहाचे सदस्य न झालेल्या भाजपच्या दोन मंत्र्यांना मध्य प्रदेश भाजपच्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला आहे.
तुलसीराम सीलवंत आणि गोविंद रजपूत अशी त्यांची नावे आहेत. ते सध्या 3 नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठीही भाजपकडून उमेदवार आहेत. घटनेतील तरतुदींनुसार सहा महिन्यांच्या आत आपली विधानसभेवर निवड न झाल्याने आपण राजीनामा देत आहोत, असे पत्र या दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
कॉंग्रेसमधून 22 आमदार फुटून ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यापैकी पंधरा जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मात्र, बाकीच्या मंत्र्यांचा समावेश 2 जुलै रोजी मंत्रिमंडळात झाला असल्याने त्यांना अजून सहा महिन्यांच्या मुदतीची अट लागू नसल्याने त्यांच्यावर मात्र राजीनाम्याची वेळ येणार नाही.
मध्य प्रदेशात सध्या एकूण 28 जागांसाठी पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या निकालावर शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचे भवितव्य निश्चित होणार आहे. सरकार टिकवण्यासाठी यातील किमान आठ ते नऊ जागा जिंकणे भाजपसाठी आवश्यक बनले आहे.