नवी दिल्ली – कुटूंबाला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांमुळे आलेल्या नैराश्यातून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना तेलंगणमध्ये घडली. ती विद्यार्थिनी दिल्लीत शिक्षण घेत असल्याने तिच्या आत्महत्येचे पडसाद देशाच्या राजधानीतही उमटले.
ऐश्वर्या रेड्डी (वय 19) ही विद्यार्थिनी दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बीएससी मॅथ्स ऑनर्सच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. कॉलेजच्या वसतिगृहात ती राहत होती. मात्र, करोना संकट गहिरे बनल्यानंतर कॉलेज प्रशासनाने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना घरी जाण्यास सांगितले.
त्यामुळे ऐश्वर्या काही महिन्यांपूर्वी तेलंगणमधील घरी परतली. मेकॅनिक असलेल्या वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी कर्ज काढले होते. आता त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. हुशार ऐश्वर्याला पुढील शिक्षण घेता यावे यासाठी तिच्या लहान बहिणीचे शिक्षण कुटूंबीयांनी थांबवले होते.
कुटूंबाच्या आर्थिक विवंचनेमुळे पुढील वर्षाची कॉलेज फी भरण्याची चिंता ऐश्वर्याला सतावत होती. त्यातून तिने आठवडाभरापूर्वी घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरले जाऊ नये. माझ्या कुटूंबाने माझ्या शिक्षणासाठी खूप खर्च केला. मात्र, माझे शिक्षण मोठा बोजा ठरत आहे. शिक्षणाशिवाय मी जगू शकत नाही, अशी चिठ्ठी तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली.
भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) जाण्याची आकांक्षा बाळगून असणाऱ्या ऐश्वर्याच्या आत्महत्येचे वृत्त समजल्यानंतर दिल्लीत विद्यार्थी संघटनांनी निदर्शने केली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थिनीच्या आत्महत्येची दखल घेऊन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकारने जाणूनबुजून नोटाबंदी आणि देशबंदी (लॉकडाऊन) करून अगणित घरे उद्धवस्त केली, असा आरोप त्यांनी ट्विटरवरून केला.