पिंपरी – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या पिंपरीतील फलकावरील नेत्यांची छायाचित्रे झाकण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची आज (शनिवारी) धावपळ उडाली होती.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान आहे. आचारसंहिता असल्याने नेत्यांचे फलक लावले जात नाहीत. त्याच्या माध्यमातून त्यांची जाहिरात होते. नागरिकांवर त्यांचा प्रभाव पडू शकतो. त्यासाठी आचारसंहितेत नेत्यांचे फलक लावले जात नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवारी जयंती आहे. जयंतीनिमित्त विविध संस्थांनी जयंतीच्या शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. ज्या फलकांवर राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. ते फोटो निवडणूक अधिकाऱ्यांनी झाकले आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी चार दिवसांपासून पिंपरी येथे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.