कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे. तसेच दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुसळधार पावसाने पंचगंगा नदीपात्राबाहेर गेले आहे.
राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी 30 फुटांवर पोहोचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली असून, नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. जिल्ह्यातील 53 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले असून, काही मार्गांवरील वाहतूकदेखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत गेल्या 24 तासांत सतरा फुटांनी वाढ झाल्याने नदीतील मंदिरे आता पाण्याखाली गेली आहेत. याशिवाय आजूबाजूच्या शेतातदेखील पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.