मुंबई – मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जून 2021 करिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली.
राज्यातील करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत केशरी शिधापत्रिकाधारकांना माहे मे- 2020 ते ऑगस्ट 2020 या चार महिन्याच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने गहू रुपये 8/- प्रति किलो व तांदूळ रुपये 12 प्रति किलो प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्याचा सवलतीच्या दराने लाभ देण्यात आला आहे.
या योजनेतील अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे वाटप केशरी शिधापत्रिकाधारकांना महिन्याला प्रतिव्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य माहे जून 2021 करिता गहू रुपये 8 प्रतिकिलो व तांदूळ रुपये 12 प्रतिकिलो या सवलतीच्या दराने वितरण करण्यात येईल.
केशरी शिधापत्रिकाधारकांपैकी जे शिधापत्रिकाधारक अन्नधान्याची प्रथम मागणी करतील, त्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य वितरण करण्यात येईल. या योजनेतील ज्या अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये सदर योजनेतील अन्नधान्य शिल्लक आहे त्याच शिधावाटप दुकानातून अन्नधान्य वितरण करण्यात येईल.