जयपुर – केंद्र सरकार लवकरच सीएए कायदा लागू करणार आहे असे जे विधान भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी केले आहे त्यावर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. नढ्ढा यांचे हे विधान दुर्देवी आहे असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
करोना महामारीच्या आधी सीएए कायद्यामुळे संपुर्ण देशभर जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. केवळ भाजपच्या यानिर्णयामुळेच देशभर हा तणाव निर्माण झाला होता आता भाजपचे लोक पुन्हा हाच प्रकार करू इच्छित आहेत असे ते म्हणाले. सध्या करोनाचे संकट अजून संपलेले नाही.
त्याचा एकत्रित मुकाबला करण्याऐवजी भाजपला देशात पुन्हा अस्थिरता हवी आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपने देशातील शांतता आणि सामाजिक एकोपा नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही गेहलोत यांनी केले आहे.