मुंबई – बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी लोढा समितीने आखून दिलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
या पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी शहा हे गुजरात क्रिकेट संघटनेच्या पदावर होते. त्यामुळे त्यांनी समितीच्या कुलिंगऑफ कालावधीचा भंग केल्या आहे असे या तक्रारीत म्हटले आहे. एक व्यक्ती मंडळातील किंवा संघटनेतील एका पदावर सलग दोन टर्म (6 वर्षे) बसलेली असेल तर या व्यक्तीला पुढील तीन वर्षे कुलिंग ऑफ कालावधी स्वीकारावा लागतो व या कालावधीत ही व्यक्ती संघटनेत तसेच मंडळातही कोणतेही पद स्वीकारू शकत नाही. असे आचारसंहितेत स्पष्ट केलेले असूनही शहा हे संघटनेतील पद सोडून मंडळाचे सचिव बनले.
कोणतीही व्यक्ती राज्य किंवा राष्ट्रीय संघटनेवर सलग सहा वर्षे कोणतेही पद घेऊ शकत नाही. शहा यांच्याप्रमाणेच मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषविले होते, त्यामुळे त्यांना मंडळाचे अध्यक्षपद कसे स्वीकारू शकतात असे, बिहार क्रिकेट संघटनेचे सदस्य आदित्य वर्मा यांनी ही तक्रार केली आहे.
गांगुलीला सूट द्यावी….
गांगुली याला जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन वर्षांच्या कुलिंग ऑफ कालावधीतून सूट द्या अशी मागणीही वर्मा यांनी केली आहे. लोढा समितीने केलेल्या शिफारशींमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे मान्य करत मंडळाच्या घटनेत सुधारणा झाली. पण गांगुलीच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीला आपली तीन वर्षांची मुदत पूर्ण करण्याची मुभा द्यावी, असेही वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक विनंती अर्ज दाखल करून आपले म्हणणे सादर केले आहे.