मुंबई – करोनाच्या भीतीमुळे यंदा होणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) पुढे ढकलली गेली असली तरी आता पूर्ण स्पर्धाच रद्द केली जाण्याची परिस्थिती दिसत आहे. मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा रविवारपासून सुरु होणार होती. मात्र, ती 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र त्यावेळी देखील करोनाचा धोका कायम राहण्याचे संकेत मिळाले असल्याने आता ही स्पर्धा यंदा आयोजित करणेच कठीण बनले आहे, असे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केल्यामुळे या काळात तर कोणतीही स्पर्धा होऊच शकत नाही. करोनाचा वाढता प्रभाव पाहता या तारखेपर्यंत देखील सध्याच्या परिस्थितीत काही सकारात्मक बदल होतील असे वाटत नाही, त्यामुळे यंदा ही संपूर्ण स्पर्धाच रद्द केली जाऊ शकते.
यापूर्वी मंडळाने अधिकारी व संघमालकांची बैठक घेण्याचे ठरविले होते. मात्र, ही बैठक देखील रद्द करण्यात आली. जपानमधील ऑलिम्पिक जर पुढे ढकलले जाऊ शकते तर आयपीएल तर खूपच लहान स्पर्धा आहे त्यामुळे ही स्पर्धा रद्द केली जाऊ शकते, असेही मंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केले आहे.
पुन्हा लिलाव नाही
14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन तसेच 15 एप्रिलपर्यंत परदेशी व्यक्तींचे रद्द करण्यात आलेले व्हिसा केंद्र सरकार पुन्हा कायम ठेवेल अशी शक्यता वाटत नसल्याने ही स्पर्धा रद्द होणार याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत सरकार व क्रीडा मंत्रालयाने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. जर सरकारने आपली भूमीका कायम ठेवली व स्पर्धा रद्द झाली तर या स्पर्धेसाठी करण्यात आलेला खेळाडूंचा लिलाव कायम राहणार असून स्पर्धा जेव्हा कधी घेतली जाईल त्यावेळी खेळाडूंचा पुन्हा एकदा लिलाव होणार नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
5 हजार कोटींचे नुकसान
आयपीएल जर रद्द झाली तर मंडळाला जवळपास 5 हजार कोटी रुपयांच्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. स्पर्धेच्या प्रक्षेपण हक्कांच्या मोबदल्यात मंडळाला जवळपास 4 हजार कोटी रुपये मिळतात. तसेच प्रत्येक संघाकडून प्रत्येकी 100 कोटी रुपयांची मंडळाला कमाई होते.