मुंबई – करोनाच्या धोक्यामुळे यंदाची इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) पुढे ढकलण्यात आली. मात्र, आता हा धोका कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने आता ही स्पर्धाच रद्द होण्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिले आहेत. मूळ वेळापत्रकानुसार येत्या रविवारपासून सुरू होणार होती, त्यात बदल करून ही स्पर्धा 15 एप्रिलपासून सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते, मात्र, आता देशात लॉकडाऊन केल्यामुळे ही स्पर्धाच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एप्रिल महिन्यात देखील करोनाचा धोका राहणार हे स्पष्ट दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे आता या स्पर्धेच्या तारखादेखील यामध्ये येत असून त्याचमुळे ही स्पर्धा आता पुढे ढकलली जाणार नाही तर रद्दच केली जाणार असे आता संकेत खुद्द मंडळाने दिले आहेत. देशात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन 14 एप्रिलला संपेल. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही स्पर्धा सुरू करणे शक्यच नाही हे उघड झाल्याने आता ही स्पर्धा होणार नसल्याचे समोर येत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी या स्पर्धेबाबत 15 एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितल्यामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग जमा झाले होते.
यंदाची आयपीएल आणखी पुढे घेण्याबाबत चाचपणी होऊ शकते किंवा रद्द करण्यात येऊ शकते. मंडळाने केवळ मे महिन्यातच कोणतीही मालिका आयोजित केलेली नसल्याने या एकाच महिन्यात सामन्यांची संख्या कमी करून मिनी आयपीएल खेळविली जाऊ शकते का, हे पाहण्यात येईल असेही मंडळाने सांगितले असले तरी इतक्या कमी कालावधीत देशात विविध मैदानांवर सामन्याचे आयोजन करणेही शक्य नाही. त्यानंतरही संघमालकांनी मिनी स्पर्धेसाठी होकार द्यायला हवा. तसेच व्हिसा रद्द केल्याने परदेशी खेळाडूंना ही स्पर्धा खेळविली गेली तरी त्यात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे संघ मालक या प्रस्तावाला तयार होणार नाहीत.