मुंबई – भारताचा विकास दर जेवढ्या वेगाने कमी झाला तेवढ्याच वेगाने तो वाढणार आहे. म्हणजे इंग्रजी व्ही अक्षराप्रमाणे अर्थव्यवस्थेची वाटचाल होणार आहे. कमी झालेला विकास दर लवकरच सकारात्मक पातळीवर येईल, असा दावा रिझर्व्ह बॅंकेच्या जानेवारी महिन्यातील अर्थव्यवस्थेवरील अहवालात करण्यात आला आहे.
आता भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे सर्व मनुष्यबळ अर्थव्यवस्थेसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. मुळात करोना व्हायरसमुळे भारतीय मनुष्यबळाचे कमी नुकसान झाले आहे.
ई- कॉमर्स व डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्र पूर्णपणे पूर्वपदावर आले असून या क्षेत्रातील उत्पादकता वाढली आहे. रोजगार आणि कारखान्यातील उत्पादन पूर्वपदावर आले असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
करोना व्हायरसचा परिणाम न झालेले कृषिक्षेत्र अधिकच उत्पादक होण्याची शक्यता आहे. खरिपाचे पूर्ण पिक हातात आले आहे. रब्बीची पेरणी वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्राचा एकूण अर्थव्यवस्थेच्या वाढीला उपयोग होणार आहे असे अहवालात म्हटले आहे.