मुंबई – भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू व महाराष्ट्राचा अव्वल खेळाडू केदार जाधव याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नसल्याने त्याची कारकीर्द जवळपास संपल्यातच जमा असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने दिले आहेत.
2014 साली केदारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने एकदिवसीय 73 सामने खेळताना 52 डावांत 1389 धावा केल्या आहेत. त्यात 2 शतके तर, 6 अर्धशतकांचा समावेश आहे. केदारने गेल्या काही सामन्यांमध्ये सरस कामगिरी केली नसल्याने कर्णधार विराट कोहलीने मनीष पांडेला संधी दिली होती, त्यामुळे केदारच्या कारकिर्दीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्रेयस अय्यर, शुभमन गिल व शिवम दुबे या तरुण खेळाडूंना जास्तीतजास्त संधी देण्याचे धोरण ठरल्याने केदारचा संघात समावेश झालेला नाही. दुसरीकडे अष्टपैलू हार्दिक पंड्या संघात परतल्याने केदारच्या कारकिर्दीला पूर्णविराम बसल्याचे स्पष्ट होत आहे.