मुंबई – प्रत्येकाला जीवनात असा एखादा धक्का बसतो, ज्यातून आपण धडा शिकतो. आयुष्यात मला असाच धक्का बसला आणि शिक्षा म्हणून मला क्रिकेटपासून दूर राहावे लागले. या कालावधीत मला माझा खेळ आणि माझ्या मानसिकतेवर काम करता आले, ज्याचा फायदा आयपीएलमध्ये मला मिळतो आहे असे मत मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने व्यक्त केले आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड झाली. ज्यात हार्दिक पंड्याचा समावेश आहे. या संदर्भात बोलताना पांड्याने आपले मत व्यक्त केले असून एका टीव्ही कार्यक्रमात महिलांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांना बीसीसीआयने काही कालावधीसाठी निलंबित केले होते. बीसीसीयचा लोकपाल अजूनही या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणी आपण दोषमुक्त होऊ, असा विश्वासही हार्दिक पंड्याने यावेळी व्यक्त केला.