नवी दिल्ली – एएफसी करंडक आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या 2027 साली होणाऱ्या मोसमाचे यजमानपद मिळावे, यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) निविदा सादर केली आहे. भारताने 2023 सालच्या स्पर्धेतील लिलावात सहभाग घेतला होता. मात्र, काही दिवसांतच भारताने बोलीतून माघार घेतली होती. यावेळी मात्र 2027 साली होणारी स्पर्धा भारतात व्हावी यासाठी महासंघाने प्रयत्न सुरू केले आहेत.
करोनाच्या संकटामुळे स्पर्धेच्या यजमान पदासाठीच्या लिलाव बोलीची प्रक्रिया केव्हा होणार याबाबत जागतिक फुटबॉल महासंघ येत्या काही दिवसांत जाहीर करणार आहे. आशिया खंडातील ही स्पर्धा अत्यंत मानाची समजली जाते. ही स्पर्धा भारताला मिळाली व त्याचे यशस्वी आयोजन झाले तर भविष्यात भारतीय फुटबॉलच्या विकासात हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे महासंघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.