सिडनी – हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकात दोन षटकार फटकावताना यजमान ऑस्ट्रेलियाच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. त्याच्या वादळी फलंदाजीने भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमित टी-20 सामन्यांच्या मालिकेत लोळवले.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अखेरच्या षटकांत 14 धावांची गरज असताना पंड्याने दोन षटकार फटकावले आणि भारतीय संघाचा टी-20 सामन्यांच्या इतिहासातील सलग 10 वा विजय नोंदवला. गेल्या वर्षी डिसेंबरपासून भारतीय संघाने एकही टी-20 सामना गमावलेला नाही.
कोहलीच्या संघाने डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. त्यानंतर जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्धचे दोन सामने जिंकले. त्यानंतर न्यूझीलंडला त्यांच्याच देशात सलग 5 टी-20 सामने जिंकताना त्यांना व्हाइटवॉश दिला होता. या दौर्यावर आलेल्या भारतीय संघाला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता.
या पराभवाचा वचपा काढताना भारताने यजमानांना त्यांच्याच देशात टी-20 मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी केली. या विजयासह भारतीय संघाने परदेशात सर्वात जास्त टी-20 सामने जिंकण्याचाही विक्रम केला. आता येत्या मंगळवारी या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना होत असून त्यात विजय मिळवत यजमानांना व्हाइटवॉश देण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे.