मुंबई – हॉटेल चालकांना रात्री साडेअकरा वाजेपर्यंत हॉटेल उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांचे आणि हॉटेल चालकांचे नुकसान होत आहे. याकरिता हॉटेलचा कालावधी दोन तासांनी वाढवावा अशी मागणी राज्यातील हॉटेल चालकांच्या संघटनेने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संघटनेने म्हटले आहे की, जर रात्री साडेअकरा ऐवजी सकाळी दीड वाजेपर्यंत हॉटेल चालू ठेवण्याची परवानगी दिली तर प्रत्येक दिवसाला 50 कोटी ते 75 कोटी रुपयांचा महसूल वाढू शकतो. अगोदर अशाच पद्धतीने हॉटेलचे कामकाज चालू होते, याची आठवण या पत्रात करून देण्यात आली आहे.
आता क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांना सेवा देता येते. मुळात जेवण्यासाठी आलेले लोक रात्री नऊ नंतर येतात. कमी वेळ असल्यामुळे ग्राहकांना त्रास होतो. त्याचबरोबर हॉटेलचे नुकसान होते. त्यामुळे पूर्ण क्षमतेने हॉटेलमध्ये ग्राहक घेऊ देण्याची परवानगी देण्याची गरज आहे.
हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल या संघटनेने महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. मात्र आठ महिन्यापासून हा व्यवसाय बंद होता. आता नववर्षानिमित्त हॉटेलमध्ये गर्दी होणार असताना या नियमामुळे आम्हाला पूर्ण क्षमतेने काम करता येत नसल्याचे या संघटनेचे अध्यक्ष शेरी भाटिया यांनी म्हटले आहे.
मॉल आणि इतर ठिकाणीही कामकाजाचे दोन तास वाढविल्यानंतर महसुलात 30 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. त्यामुळे हॉटेल आणि मॉलमधील कर्मचारी भरती वाढू शकते. हॉटेलमध्ये महाराष्ट्रात 50 हजार लोक काम करतात. सरकार आमच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक तो निर्णय घेईल अशी आशा या संघटनेने व्यक्त केली आहे.