नागपूर – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली हे अद्याप सीबीआयने स्पष्ट केलेले नाही. या प्रकरणी पाच महिन्यांपासून तपास सुरू असून सीबीआयने लवकरात लवकर खुलासा करावा, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनिल देशमुख म्हणाले, सुशांत सिंह प्रकरणामध्ये सीबीआयला तपास देऊन चार ते पाच महिने झाले आहेत. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. या केसच्या बाबतीतला तपासाचा अहवाल सीबीआयने लवकरात लवकर जनतेसमोर ठेवावा.
राज्यातील जनतेसह महाराष्ट्राबाहेर लोक अतिशय उत्सुकतेने सीबीआयच्या या तपासाची वाट पाहत आहेत. सीबीआयने याचा लवकरात लवकर खुलासा करावा. त्यामुळे ही आत्महत्या होती की त्याची हत्या करण्यात आली याबद्दलचं सत्य जनतेसमोर येईल, असे देशमुख म्हणाले.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा मुद्दा राज्यात प्रचंड गाजला होता. या मुद्यावरून अनेक राजकीय वादविवाद बघायला मिळाले. त्याचबरोबर सुशांतची हत्या झाल्याचा आरोपही करण्यात आला. नंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आली होती. मात्र, सीबीआयकडून यावर कोणतही भाष्य करण्यात आलेले नाही. यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी गळफास घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र उलटसुलट चर्चांचे पेव फुटले होते. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर हत्या असल्याचेही म्हटले होते. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचे गुढ उलगडलेले नाही.