नवी दिल्ली – परतीच्या पावसाने राज्यासह देशात धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे या पावसात मोठे नुकसान झाले. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. मात्र, आता दिलासादायक माहिती मिळाली असून पाऊस हा केवळ चार दिवसांचा पाहुणा असणार आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण भारतीय द्वीपकल्पात पाऊस संपलेला असेल. सध्या देशातील अनेक भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती दिसत असली तरी चार दिवसानंतर संपूर्ण देशभरात कोरडी स्थिती असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, गुजरात, ओडिशा, उत्तर महाराष्ट्र, उत्तर आणि मध्य अरबी समुद्र, या भागात मान्सूनच्या माघारीसाठी अनुकुल स्थिती निर्माण झेलेली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत अशीच स्थिती पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र तसेच ईशान्येकडील राज्यांत तयार होईल.
परतीच्या पावसाची तारीख ही 15 ऑक्टोबर असते मात्र, यावेळी उशीर झाला आहे. बंगालचा उपसागर तसेच दक्षिण द्वीपकल्पातील जमीनीवरून ईशान्येकडून वारे वाहत आहेत. त्यामुळे नैऋत्य मोसमी वारे 28 ऑक्टोबरच्या सुमारास संपूर्ण देशातून मागे हटण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा ईशान्यभागाकडे सरकत आहे. त्यामुळे आसामा, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर आणि मिझोराम या साधारण ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.