मुंबई – राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केल्यानंतरही करोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही. शिवाय करोनाबाधितांची संख्या दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे किराणा दुकांनी वेळ सकाळी 7 ते 11 करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच निर्बंध कडक करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. ब्रेक द चेन साधायचे असेल तर यापुढे गरज पडेल तसं आणखी गोष्टी कडक करण्यात येतील, असेही टोपे यांनी सांगितले.
30 एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंधांची आवश्यकता आहे. कडक निर्बंध असतानाही लोक घराबाहेर विनाकारण फिरताना दिसत आहेत. याला आळा घालण्यासाठी किराणा दुकाने 7 ते 11 अशी चारच तास सुरु ठेवण्याबाबत चर्चा झाली आहे. लवकरच हा निर्णय लागू होईल. जिल्हास्तरावर यासंदर्भात निर्णय घेण्याबाबतही चर्चा झाली आहे, असे राजेश टोपे यांनी सागितले.
महाराष्ट्रात ऑक्सिजनची मोठी मागणी आहे. सध्या 1550 टन ऑक्सिजन दररोज मिळतो आहे. केंद्र सरकारने तो वाढवून 1800 टनपर्यंत जाऊ शकतो असे सांगितले आहे. मात्र ऑक्सिजन मिळाला नाही तर मोठी अडचण होऊ शकते. राज्याबाहेरून भिलाई, बिल्लारी, विशाखापट्टणम येथून काही प्रमाणात ऑक्सिजन आणला जात आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे युनिट बसवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घ्यावा, असेही टोपे यांनी म्हटले आहे.