कोल्हापूर – आप्पासाहेब नलवडे गडहिग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याला ब्रिक्स कंपनीचा रामराम घ्यावा, असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कंपनी हा साखर कारखाना करार संपण्यापूर्वीच दोन वर्षे आधी सोडणार असल्याचे स्पष्टीकरण केले. हा कारखाना ब्रिक्सने दहा वर्षे चालवण्याचा करार केला असतानाही दोन वर्ष आधीच हा कारखाना सोडणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या ३६ दिवसांपासून कारखान्यावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत देण्यापोटी आंदोलन सुरू होते. एकूण दीड कोटी रकमेपैकी ७५ लाखांचे धनादेश आज दिले. तर उर्वरित ७५ लाख एक महिन्यानंतर दिले जाणार आहेत.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, तुमचे आंदोलन सुरू होते आणि इकडे मी लोकप्रतिनिधी म्हणून प्रचंड अस्वस्थ होतो. २०१३ सली ब्रिक्स कंपनीने दहा वर्षे कराराने हा कारखाना चालवायला घेतला. मिटकॉन निर्धारित केलेली त्रेचाळीस कोटींची देणी शासनाच्या आदेशानुसार आधीच दिली आहेत.
सेवानिवृत्त कामगारांच्या वतीने बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव खोत म्हणाले, सेवानिवृत्त झालेल्या २९१ पैकी ५९ कर्मचारी मयत आहेत. तर ४० जण आजारी आहेत. आंदोलन काळात आमच्या तोंडून भलं-बुरं गेल असेल व टीकाही झाली असेल, याबद्दल जाहीर माफी मागतो.
ब्रिक्स कंपनी ने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रचंड तोटा सहन करून आठ वर्षे कारखाना चालविला . यामध्ये एफआरपीसह कामगारांचे पगार – बोनस, तोडणी वाहतुक बिले वेळेवर देण्यासह मशिनरीवरही प्रचंड खर्च केला आहे. लिफ्टचे करूनही ब्रिक्सला जणूकाही ईस्ट इंडिया कंपनीच ठरवून, त्रास देण्याचा केलेला प्रयत्न दुर्दैवीच आहे. मुश्रीफ साहेब, आंदोलनासारख्या मार्गाने तुम्हाला मनस्ताप दिल्याबद्दल माफ करा. परंतु; भविष्यातही या कारखाना आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा.
यापुढेही सहकार्य राहील!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, तुम्ही आंदोलनाला बसलाय म्हणून नव्हे; तर कंपनीने यावर्षी कारखाना सोडून जायचं हे ठरवलंच होतं. तशी पूर्वकल्पना शासनाला दिलेलीही आहे. हा हंगाम संपण्यापूर्वीच शासनाला तसे लेखी पत्र देणार आहोत. कारण, पुढील हंगाम चालू करण्यासाठी संचालक मंडळाला तयारी करावी लागते, तो अवधीही त्याना मिळाला पाहिजे. दरम्यान; यापुढेही साखर कारखाना व कर्मचाऱ्यांना आपले सहकार्य राहील, असेही ते म्हणाले.