मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपाचीच री ओढत असून घटनेचा सन्मान राखण्यासाठी त्यांना तातडीने माघारी बोलवावे, अशी मागणी महाराष्ट्रातील सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेने आज केली.
राज्यातील माहाविकास आघाडी सरकार हे स्थिर आणि मजबूत आहे. त्यामुळे राज्य सरकारवर निशाणा साधण्यासाठी राज्यपालांच्या खांद्यांचा वापर करू नये, अशी टीका शिवसेनेने केली आहे. या वक्तव्यामुळे कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
कोश्यारी जेंव्हापासून महाराष्ट्राचे राज्यपाल बनले आहेत, तेंव्हापासून ते नेहमी बातम्यांत किंवा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ते नेहमी वादात का सापडतात? हा एक प्रश्न आहे. अलीकडेच, राज्य सरकारच्या विमनांचा वापर करण्यावरून ते चर्चेत आले.
राज्यपालांना डेहराडूनला जाण्यासाठी राज्य सरकारचे विमान हवे होते. त्यामुळे गुरूवारी सकाळी ते विमानात जाऊन बसले. पण, विमनाला उड्डाणाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे निराश होऊन खासगी विमानाने डेहराडूनला गेले, असे शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे.
या मुद्द्याचे भाजपा राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर राज्य सरकारने विमानातून जाण्याची परवानगीच दिली नव्हती तर ते विमानात जाऊन बसलेच कशाला? असा सवाल त्यात करण्यात आला आहे. हा राज्यपालांचा खासगी दौरा होता. खासगी दौऱ्यासाठी सरकारी विमनांचा वापर राज्यपालांनाच काय मुख्यमंत्र्यांनाही करता येत नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने कायद्यानुसार कृती केली, असे त्यात म्हटले आहे.
मात्र, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सरकार अहंकारी असल्याचा आरोप करताहेत. अहंकाराचे राजकारण कोण करत आहे हे देशाला माहित आहे. तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात 200 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरी त्याकडे हे केंद्र सरकार पहायला तयार नाही, हा अहंकार नव्हे काय? असेही या अग्रलेखात म्हटले आहे.