नवी दिल्ली – कोविडची महामारी येण्याआधी देशात धार्मिक कट्टरतावाद आणि आत्यंतिक राष्ट्रवादाची महामारी आली असं विधान माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केलं आहे. शशी थरूर यांच्या ‘द बॅटल ऑफ बिलॉंगींग’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात अन्सारी यांनी हे विधान केलं.
गेल्या चार वर्षात भारताने सामाजिक देशप्रेमापासून राजकीय सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे प्रवास केल्याचं ते म्हणाले. अन्सारी यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. भाजप नेत्यांनी या विधानावर नाराजी व्यक्त करत अन्सारी यांच्यावर टीका केलीय.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. हिंदुत्व हे कट्टर असतच नाही. ते नेहमी सहीष्णू राहीलंय. हिंदुनी कधी कुणावर आक्रमण केलं नाहीय. जगात हिंदु आक्रांते कधीच नव्हते. हिंदुत्वाने सहिष्णुता शिकवलीय. म्हणूनच देशात सर्व धर्मीय गुणागोविंदाने नांदत असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
नागपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी देखील यावर प्रतिक्रीया व्यक्त केली. हमीद अन्सारी यांनी हिंदुत्ववादाचा अर्थ न समजता वक्तव्य केलंय. ज्या पदावर ते होते अशा व्यक्तीने असं विधान करणं अयोग्य असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
याधीही त्यांनी आरती करणार नाही असं म्हटलं होतं. आता हिंदुत्ववाद करोनापेक्षा वाईट ? की कट्टरतावाद कोरोनापेक्षा एक कोटीपट वाईट ? हे जनता ठरवेल असे मुनगंटीवार म्हणाले.