नवी दिल्ली – शुभमन गिल या युवा खेळाडूने भारत “अ’ संघाकडून खेळताना वेस्ट इंडिज “अ’ संघाविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारताच्या वरिष्ठ संघात देण्याची आवश्यकता होती असे भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी येथे सांगितले.
भारतीय संघांची निवड करताना निवड समितीच्या धोरणांमध्ये सातत्याचा अभावच आहे. काही लोकांना खूष करण्यास प्राधान्य न देता संघाला सध्या कोणत्या खेळाडूंची आवश्यकता आहे याचा विचार निवड समितीने केला पाहिजे असे सांगून गांगुली म्हणाले की, वेस्ट इंडिज “अ’ संघाविरुद्धच्या मालिकेत गिल याची मालिकेचा मानकरी म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. काही युवा खेळाडूंना आत्मविश्वास बळकट करण्यासाठी तीनही स्वरूपाच्या संघात स्थान देण्याची गरज होती. विराट कोहली, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा व लोकेश राहुल या खेळाडूंनाच तीनही स्वरूपाच्या संघात स्थान मिळाले आहे. अन्य खेळाडूंमध्ये सर्वच प्रकारच्या सामन्यांमध्ये कौशल्य दाखविण्याची क्षमता आहे.