जयपूर – राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या समर्थकांनी एका संघटनेची स्थापना केली आहे. ती घडामोड भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे टेन्शन वाढवणारी आहे. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थानमध्ये वसुंधरा राजे समर्थक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी भाजपच्याच काही नेते आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
त्या मंचाचे प्रदेशाध्यक्ष विजय भारद्वाज यांनी भाजपला मजबूत करण्यासाठीच आम्ही पाऊले उचलत आहोत, असे म्हटले आहे. वसुंधरा यांच्यावरील निष्ठा व्यक्त करण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी केलेली कामगिरी आम्ही राजस्थानमधील जनतेपर्यंत पोहचवणार आहोत. वसुंधरा यांना 2023 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री बनलेले आम्हाला पाहायचे आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
मात्र, वेगळा मंच उभा राहिल्याने राजस्थान भाजपमध्ये गटबाजी असल्याचे संकेत मिळत आहेत. वसुंधरा यांनी याआधी दोनवेळा त्या राज्याचे मुख्यमंत्रिपद भुषवले. मात्र, मागील काही काळापासून त्यांच्यात आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात फारसे सख्य राहिले नसल्याचे वारंवार बोलले जाते. अशात राजस्थान भाजपमध्ये वसुंधरा यांचे वर्चस्व कायम राहील या उद्देशातून त्यांचे समर्थक सक्रिय झाल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.