पुणे – भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत ई-लर्निंग स्कूल उभारण्यात आले आहे. वस्तीपातळीवरील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे आणि ही मुले गुन्हेगारी कडे वळू नयेत या उद्देशाने ही शाळा उभारण्यात आली असली तरी, महापालिका आयुक्तांच्या अनास्थेमुळे ही शाळा सुरू होत नसल्याची तक्रार भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना पाटील “आमचं काय चुकलं…! असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ही शाळा सुरू करण्यासाठी खासगी संस्थेने दिलेल्या प्रस्तावास स्थायी समिती आणि मुख्य सभेने मान्यता दिल्यानंतरही आयुक्तांकडून ती सुरू केली जात नसल्याने याबाबत पाटील यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाराजीही व्यक्त केली आहे.
याबाबत बोलताना पाटील म्हणाल्या की, महापालिकेच्या भवानी पेठ येथील सिटी सर्वे नंबर 240 येथे ही शाळा उभारण्यात आली आहे. महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या कमी असून वस्ती पातळीवरील पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आहे. मात्र, खासगी शाळांची फि परवडत नसल्याने अनेक पालक मुलांना शाळेत घालत नाहीत.
त्यामुळे ही मुले गैरमार्ग तसेच गुन्हेगारीकडे वळतात ही बाब लक्षात घेऊन ही शाळा उभारण्यात आलेली असून आपणही त्यासाठी स यादीतून निधी दिला आहे. ही शाळा सुरू करण्यासाठी रेवकाई नॉलेज फाऊंडेशन या संस्थेने प्रस्ताव दिला होता. त्यास स्थायी समितीच्या बैठकीत तसेच मुख्यसभेतही मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार, आम्ही, वारंवार महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करत असून त्या सोयीस्कर दूर्लक्ष करत राजकीय दबाबाखाली महापालिका आयुक्त शाळा सुरू करत नसल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.