बॅंका आणि एनबीएफसींची परिस्थिती सुधारणार
मुंबई – बॅंकांकडून वितरित होणाऱ्या कर्जावर परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर बिगर बॅंकिंग क्षेत्रात हे मंदीसदृश परिस्थिती आहे. तरीही वित्तीय क्षेत्रांमध्ये आशावाद आढळून येत आहे.
भारतीय उद्योग महासंघाने केलेल्या पाहणीनुसार एप्रिल – जून या महिन्यात भारतातील वित्तीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी आशावादी होते. गेल्या दोन तिमाहीपासून या क्षेत्रातील आशावाद कायम आहे. आता निवडणुका झाल्यानंतर स्थिर सरकार आलेले आहे. त्यामुळे या आशावादात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी सांगितले.
गेल्या एक वर्षापासून रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार बॅंकांचे प्रश्न कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. खराब कर्जाच्या वसुलीत वाढ होत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने सरकारी बॅंकांना बरीच भांडवली मदत केलेली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील आशावाद कायम असल्याचे बॅनर्जी यांना वाटते. बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांकडून कर्जपुरवठा कमी झाला आहे. त्याचा एकूणच अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत आहे याची जाणीव आता रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारला झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न वाढतील.