सोनेपत – शेतकऱ्यांनी दिल्ली सीमेवर जे आंदोलन सुरू केले आहे त्यात सोशल डिस्टसिंग पाळले जात नसल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे करोना फैलावण्याचा इशारा देण्यात आला आहे. तथापि शेतकऱ्यांनी हा इशारा धुडकावला असून केंद्राने केलेले शेतकरी विरोधी कायदे, करोनापेक्षा अधिक घातक आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
सीमेवर जे शेतकरी आंदोलनासाठी आज पाचव्या दिवशीही ठाम आहेत त्या शेतकऱ्यांमध्ये करोना प्रतिबंधासाठी मास्क वापरण्याचे प्रमाण कमी असून सोशल डिस्टिंसंगही पाळले जात नसल्याने तेथे करोना प्रसाराचा मोठा धोका आहे असे काहींनी नमूद केले आहे.
तथापि त्यावर प्रतिक्रीया देताना भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष जोगींदरसिंग उघराहन यांनी म्हटले आहे की आम्हाला करोनाची भीती वाटत नाही. मोदींच्या कायद्याची अधिक भीती वाटते. ते कायदे करोनापेक्षा अधिक धोकादायक आहेत असे आमचे म्हणणे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सरवानसिंग पंधेर यांनी हा इशारा धुडकाऊन लावताना म्हटले आहे की शेतकरी आंदोलनाच्यावेळीच करोनाचा धोका त्यांना कसा दिसतो. बिहार निवडणुकीच्या प्रचारात मोठी गर्दी वेळोवेळी जमवली गेली त्यावेळी त्यांना तेथे करोना प्रसाराचा धोका दिसला नाही काय असा सवाल त्यांनी केला.
किसान युनियनचे हरियाना शाखेचे प्रवक्ते गुरनामसिंग चारूनी यांनी म्हटले आहे की, मोदींना शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यायला लावणे हे आमचे प्रमुख उद्दीष्ठ आहे. या कायद्यांनी आम्हाला उद्धवस्त केले आहे. त्याच्यापुढे आम्हाला करोनाची धास्ती फार वाटत नाही.
आंदोलनासाठी जे हजारो शेतकरी जमले आहेत त्यांना करोनाची अजिबात भीती वाटत नाही आणि आम्ही त्याची फिकीरही करीत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान हरियाना सरकारने आंदोलनकारी शेतकऱ्यांना पाच हजार मास्क आज वाटले.