नवी दिल्ली, दि. 11 – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असला तरी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन अजून सुरूच आहे. तेथे टिकरी आणि सिंघु बॉर्डवर अजूनही करोनाशी मुकाबला करीत हे शेतकरी तेथे कृषी कायद्यांच्या विरोधात ठामपणे आपले धरणे आंदोलन करीत आहेत.
या शेतकऱ्यांमध्ये करोना पसरू नये म्हणून विशेष काळजी घेतली जात असून आता तेथील शेतकऱ्यांना लंगरमध्ये आरोग्यदायी काढा दिला जात आहे. त्यातून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवली जात आहे. भारत किसान युनियनचे रूपसिंग यांनी सांगितले की आम्ही टिकरी बॉर्डवर आंदोलनस्थळी 17 किमीच्या परिसरात नुकतेच पूर्ण सॅनिटायझेशन केले आहे. यापुढेही हे काम नियमितपणे सुरू राहील.
रूपसिंग म्हणाले की, करोनाच्या विरोधातील लढाईसाठी आम्हाला सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. त्यांच्याकडून कोणतीही मदतही दिली जात नाही. सर्व उपाययोजना आम्ही आमच्या खर्चानेच करतो आहे. सिंघु आणि टिकरी बॉर्डवर आजही असंख्य शेतकरी गेले सहा महिने धरणे धरून बसले आहेत.
तेथील शेतकरी आंदोलकांसाठी जी लंगर चालवली जात आहेत तेथे शेतकऱ्यांना नियमितपणे आरोग्यदायी काढा दिला जातो आहे. ही लंगर्स अहोरात्र सुरू असतात. त्यांचेही सॅनिटायझेशन नियमितपणे सुरू असते. तेथे आंदोलकांसाठी लसीकरण केंद्रही सुरू, आहे असेही त्यांनी सांगितले.