पुणे – शासकीय अधिकारी व शासकीय कार्यालये म्हंटल की याठिकाणी फक्त चाकोरीबद्ध व शासकीय नियमांवर बोट ठेवुन कागदी घोडे नाचवण्याचा कार्यक्रम सुरू असतो असा आपला समज झाला आहे. पण या संकल्पनेला छेद देण्याचे काम करत अनेक अनाथ व निराधार विद्यार्थ्यांच्या पंखात बळ भरण्याचे काम पुण्यात एक शासकीय कार्यालय करत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह, येरवडा पुणे हे अनाथ निराधार युवकांसाठी स्वावलंबी होण्याचे केंद्र बनले आहे. बालगृहातील वयाची18 वर्षे पूर्ण झालेल्या व पुढे शिक्षण, प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना येथे प्रवेश दिला जातो. त्यांना रोजगाराभिमुख औद्योगिक तसेच जीवनोपयोगी बहुतांत्रिक कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचे पुनर्वसन करणे हा अनुरक्षण गृहाचा उद्देश आहे.
संस्थेत सध्या 25 प्रवेशित शिक्षण प्रशिक्षणसाठी दाखल असून कोरोनाचा प्रादुर्भाव असतांनाही या वर्षी येथील मुलांनी उल्लेखनीय यश संपादित केले आहे. इयत्ता12वी ची परीक्षा दिलेले सर्व 7 विदयार्थी उत्तीर्ण झाले असून आकार सिसोदे हा 79% मिळवून ग्यानोबा सोपानराव मोझे महाविद्यालयात द्वितीय आला आहे. तर, ओमकार सिसोदे हा 73% गुण मिळवून तृतीय आला आहे.
तृतीय वर्ष बी कॉम परीक्षेत सुनिल वाघमारे 71% मिळवून उत्तीर्ण झाला तर, आतेश बुद्धेवार द्वितीय वर्ष अभियांत्रिकी परीक्षेत 92% गुणांसह उत्तीर्ण झाला. चंद्रकांत गोजेगावे हा विद्यार्थी एम एस डब्ल्यू च्या द्वितीय वर्षात असून त्याचे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिद्द सातत्य संयम ठेऊन आयुष्याची लढाई सकारात्मकतेने लढतांना मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे.राज्याचे महिला
बाल विकास आयुक्त डॉ ऋषिकेश यशोद, पुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी या मुलांच्या यशाबद्दल कौतुक केले असून पुढील प्रगती साठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनुरक्षणगृहाचे प्रवेशित अभियांत्रिकी,आय टी आय, हॉटेल मॅनेजमेंट, पदवी शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या निसर्गरम्य वातावरणात घेत आहेत प्रवेशीतांच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकारी व समुपदेशक आहेत.
प्रवेशीतांच्या निवास भोजन व्यवस्थेसह स्वतंत्र अभ्यासिका व मनोरंजन कक्ष आहे प्रवेशीतांच्या शिक्षण प्रशिक्षण पुनर्वसनसाठी सी एस ए ,सोस्वा व ईतर संस्थेबरोबर समन्वय साधून त्यांची मदत घेण्याचे प्रयत्न अनुरक्षण गृहाद्वारे सातत्याने करण्यात येत असल्याची माहिती अधीक्षक उस्मान शेख यांनी दिली.
महिला व बालविकास आयुक्त डॉ ऋषिकेश यशोद, बालविकास उपआयुक्त रवींद्र पाटील, पुणे विभागाचे विभागीय उप आयुक्त दिलिप हिवराळे पुणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली अनुरक्षनगृहाचे सर्व कर्मचारी, काळजीवाहक प्रवेशितांना स्वावलंबी होऊन स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. अनाथ व निराधारांच्या अंधारलेल्या आयुष्यात हे शासकीय कार्यालय नवा प्रकाश निर्माण करत आहे.