नवी दिल्ली – निर्मला सीतारमन आणि पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या सुधारणा जारी केल्या जातील, अशी आशा उद्योजकांनी व्यक्त केली आहे. बरेच ज्येष्ठ उद्योजक गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित होते.
भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी म्हटले आहे की, नव्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यावर अनुभवी आणि कार्यक्षम लोकांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे हे मंत्रिमंडळ विविध सुधारणा लागू करेल. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की, सरकारला पुन्हा गरजेपेक्षा जास्त बहुमत मिळाले आहे या संधीचा हे सरकार सदुपयोग करण्याची शक्यता आहे.
आयटीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी म्हटले की, नव्या सरकारने पहिल्या तीन वर्षांमध्ये महत्त्वाकांक्षी सुधारणा मार्गी लावण्याची गरज आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगावर या सरकारने पूर्वीही भर दिला होता आताही हे सरकार या क्षेत्रावर भर देण्याची शक्यता आहे. जीएसटी आणि नागरी संहितासारखे मोठे कार्यक्रम आगामी काळातही चालू राहतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
नव्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री पदावर निर्मला सीतारमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांनी याअगोदर उद्योग आणि वाणिज्य खात्याबरोबर संरक्षण मंत्रिपद भूषविले आहे. त्या अर्थमंत्रालयही व्यवस्थित हाताळतील अशी आशा या उद्योजकांनी व्यक्त केली आहे. 60 वर्षीय सीतारामन त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण अर्थशास्त्रात घेतलेले आहे. त्यांनी या क्षेत्रात लंडनमध्ये विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केलेले आहे. त्याचबरोबर अर्थराज्यमंत्री म्हणून अनुराग ठाकूर यांनी कार्यभार हाती घेतला आहे. त्यांनाही काही मंत्रालयात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
केंद्रीय उद्योगमंत्री म्हणून पियुष गोयल यांनी कार्यभार हाती घेतला. आपण शक्य तितक्या लवकर या मंत्रालयाचे काम वेगात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला निर्यात वाढवावी लागणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढवावी लागणार आहे या दृष्टिकोनातून आम्ही शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार केलेला आहे या कार्यक्रमाची अंमलबजावणी लगेचच सुरू करण्यात येत आहे.