मुंबई – फाॅक्सकाॅन वेदांताचा सेमिकंडक्टर बनवण्याचा महाराष्ट्रत होणारा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर या प्रकल्पाबाबत माहिती दिली आहे. प्रकल्प पाकिस्तानला गेला नाही, गुजरात देखील महाराष्ट्राचा भाऊच आहे. आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग व्यवसायात आघाडीवर आणणार असल्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिले आहे.
फडणवीस म्हणाले, शपथविधीनंतर मी वेदांता प्रकल्पाबाबत माहिती घेतली तेव्हा खूप उशिर झाला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनेच वेळकाढूपणा केल्याने हा प्रकल्प गुजरातला गेला आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच तो महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्वकश प्रयत्न केले पण उशिर झाला होता असेही फडणवीस यांनी म्हंटले आहे.
गुजरात हा देखील देशातलेच एक राज्य असून महाराष्ट्राचा भाऊ असे संबोधले जाते. त्यामुळे हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही असेही फडणवीस म्हणाले आहेत. सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती. त्यामुळे आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
महाराष्ट्राला डावलून हा प्रोजेक्ट गुजरातला का असा सवालही राज्य सरकारने उपस्थित केला होता. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पत्रव्यवहारही केला होता. पण अनिल अग्रवाल यांनी याकरिता आता उशिर झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.