नवी दिल्ली, दि. 13 – दिल्लीत गेल्या पंधरा दिवसांत करोना रुग्णसंख्येत घट झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 15 दिवसांपूर्वी दिल्लीत करोना रुग्णवाढीचा दर 35 टक्क्यांवर पोहोचला होता. आता करोना रुग्णवाढीचा दर 14 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड्स रिकामे झाले असून, नातेवाइकांची वणवण थांबली आहे.
दिल्लीत ऑक्सिजनची मागणी 582 मेट्रिक टनवर आली आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहून आमचे काम 582 मेट्रिक टनमध्ये होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आमच्या कोट्यातील अतिरिक्त ऑक्सिजन इतर राज्यांकडे वळवा, अशी विनंती केली आहे. गेल्या 24 ते 48तासांत रुग्णालयातून क्वचितच ऑक्सिजनसाठी कॉल येत आहेत, असे सिसोदिया यांनी सांगितले.