कोल्हापूर – करवीर संस्थानची दीर्घ परंपरा असलेला शाही सीमोल्लंघन सोहळा यंदा करोनामुळे रद्द करण्यात आला आहे. राजघराण्यातील शाही परंपरेनुसार विजयादशमी दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी प्रत्येक वर्षी न चुकता या सोहळ्याचे आयोजन केले जाते. तथापि, या दीर्घ परंपरा व रितीरिवाजात यंदा प्रथमच खंड पडणार आहे.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व विश्वस्त, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, कोल्हापूर यांनी रविवार, दि. 25 ऑक्टोबर रोजी दसरा चौकात होणारा शाही दसरा व विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी-टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील इतर नागरी व ग्रामीण भागात नवरात्रीच्या निमित्ताने होणारे विविध कार्यक्रम व विजयादशमी दिवशी होणारे कार्यक्रमाबाबत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निर्गमित केला आहे.
संपूर्ण देशात म्हैसूर व कोल्हापूर या दोन राजघराण्यातर्फे दसऱ्यानिमित्त शाही सीमोल्लंघन केले जाते. कोल्हापुरात दसरा महोत्सव समिती परंपरेनुसार या सोहळ्याचे आयोजन करत असते. सोनं तथा प्रतिकात्मक आपट्याची पाने लुटण्याकरिता राजपरिवारातील सर्व सदस्य शाही गणवेश परिधान करून मेबॅक गाडीतून लवाजम्यासह ऐतिहासिक दसरा चौकात येतात.
अंबाबाई, तुळजाभवानी तसेच गुरुमहाराज यांच्या पालख्या देखील लवाजम्यासह येत असतात. तसेच हा सोहळा पाहण्यासाठी मान्यवर हस्तींसह लाखो करवीरवासीय जमलेले असतात. अनेक वर्षाची ही प्रथा असून ती डोळ्यात साठविण्यासाठी करवीरची जनता आसुसलेली असते; परंतु यंदा करोना संसर्गाचे सावट या सोहळ्यावर आहे. त्यामुळे सोहळा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती.
सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी न्यू पॅलेसवर जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याशी याविषयी चर्चा केली. यावेळी करोनाचा संसर्ग तसेच सोहळ्यास होणारी मोठी गर्दी यावर चर्चा झाली. सोहळ्यातील गर्दी संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू नये, यावर दोघांचे एकमत झाले. त्यानंतर शाहू छत्रपतींनी यंदा हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला.